छत्रपती संभाजीनगर: लग्नासाठी माहेरच्यांनी तब्बल १२ लाख रुपये खर्च केल्यानंतरही चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या मागणीवरून विवाहितेचा छळ केल्याचा आरोप आहे. पतीकडून मारहाण आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून निकिता ऋषिकेश वाकळे (२३) यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सुरेवाडी, जाधववाडी येथे घडली. या घटनेनंतर निकिता यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हसूल पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पती ऋषिकेश सोमीनाथ वाकळे (२६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निकिता यांचे वडील गणेश अर्जुन पठारे हे बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथे राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, निकिता आणि ऋषिकेश यांचा चार ते पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबीयांनी सुमारे १२ लाख रुपये खर्च केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच निकिताला सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यास सुरुवात झाली.

चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, अशी मागणी पती ऋषिकेश तिच्याकडे करत असल्याचा आरोप आहे. लग्नात मोठा खर्च झाल्याने निकिताने आणखी पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे ऋषिकेशने तिच्याशी मारहाण केली, तर घरगुती कारणांवरून सासरच्या अन्य मंडळींकडूनही तिचा मानसिक छळ केला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा त्रास वाढत गेल्याने निकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणी पती ऋषिकेश सोमीनाथ वाकळे, सासू रेखा सोमीनाथ वाकळे, सासरे सोमीनाथ कचरू वाकळे (५३), दीक्षा तांबे (२९), दीर सुमित सोमीनाथ वाकळे (२०), अनिता दामोदर पवार (३५) आणि मंदा हरिदास दारकुंडे (३३, सर्व रा. सुरेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
निकिता या देव पिंपळगाव येथील रहिवासी असून बीएस्सीचे शिक्षण घेत होत्या. त्यांचा विवाह जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथील ऋषिकेश वाकळे याच्याशी झाला होता. ऋषिकेश हा शहरातील एका धर्मादाय रुग्णालयात नोकरी करत असल्याची माहिती आहे. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच निकिताला सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, निकिताच्या भावाने तिच्या पतीच्या अनैतिक संबंधांबाबतही आरोप केला आहे. या सर्व कारणांमुळे निकिता मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री निकिताने आईला फोन करून ‘तुझी काळजी घे,’ असे सांगितले होते. त्यानंतर शनिवारी तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
दरम्यान, निकिता यांच्या अंत्यविधीच्या वेळी हडको एन-११ येथील स्मशानभूमीत माहेर आणि सासरच्या नातेवाइकांमध्ये वाद झाला. आरोप-प्रत्यारोप वाढल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आणि दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.






