सांगली : सांगली शहरातील खण परिसरात 19 वर्षीय दुर्वांक प्रमोद शेवाळे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात त्याच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले असून, प्रेयसीने लग्नासाठी धर्म परिवर्तनाची अट घातल्यामुळे तो मानसिक तणावात गेला आणि त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दुर्वांकची ओळख कोल्हापूरमधील एका तरुणीशी झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लग्नासाठी संबंधित तरुणीने दुर्वांकसमोर “माझ्याशी लग्न करायचे असेल तर तुला माझा धर्म स्वीकारावा लागेल,” अशी अट ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अटीवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. धर्म परिवर्तनासंदर्भातील या अटीमुळे दुर्वांक काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात होता. गुरुवारी दुपारीही दोघांमध्ये याच विषयावर फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर दुर्वांकने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
दुर्वांकच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी त्याच्या आईच्या मोबाईलची तपासणी केली असता, संबंधित तरुणी आणि दुर्वांक यांच्यात धर्म परिवर्तनाच्या अटीबाबत झालेल्या संभाषणाचे चॅट आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे चॅट पोलिसांना दाखवूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दुर्वांकच्या नातेवाईकांनी केली आहे. या आरोपांबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.







