पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड परिसरातील चाकणजवळ एक अत्यंत वेदनादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. चेहऱ्यावर आलेल्या फोडांमुळे आलेल्या तीव्र नैराशातून २७ वर्षीय विवाहितेने स्वतःच्या घरीच गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मंगळवार, 21 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आंबेठाण गावात ही दुर्दैवी घटना घडली. अश्विनी संदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या महिला विवाहितेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अश्विनी यांच्या चेहऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून त्वचेचा त्रास वाढल्याने मोठे फोड आले होते. या समस्येमुळे त्या सतत मानसिक तणावात राहत होत्या. त्यांनी याबाबत पतीकडे बोलून उपचारासाठी दवाखान्यात जाण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

घटनेच्या दिवशी पती संदीप पाटील बाहेर गेल्यानंतर काही वेळाने परत आले, तेव्हा घराचा मुख्य दरवाजा आतून पूर्णपणे बंद होता. हाका मारल्या, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर चाकण पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी बळाने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी अश्विनी यांनी घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.







