अहिल्यानगर: संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार परिसरात तमाशा मंडळातील कलाकारांवर झालेल्या हल्ल्याने सांस्कृतिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. वाहनाला कट मारल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून, या मारहाणीत पुरुषांसह महिला कलाकारांनाही लक्ष्य करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी सुरुवातीला वाद घालत इतरांना बोलावले आणि त्यानंतर जमावाने तमाशा मंडळातील कलाकारांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही कलाकार जखमी झाले असून, महिलांशी अत्यंत गैरवर्तन केल्याचेही समोर आले आहे. महिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या कपड्यांवरही हात घालण्यात आल्याचे आरोप आहेत.
या घटनेत मंडळाशी संबंधित काही वरिष्ठ व्यक्तींनाही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तमाशा ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असून, कलाकारांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे. कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात असून, अशा घटनांमुळे कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







