पुणे : पुण्यातील मंतरवाडी परिसरात झालेल्या गोळीबार आणि 5 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश आलं आहे. पोलिसांनी थेट राजस्थान गाठून कारवाई करत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका सक्रिय सदस्याला बेड्या ठोकल्या आहेत. पवन राम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला राजस्थानमधील हनुमानगड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

पुण्यातील फुरसुंगी-मंतरवाडी भागात एका प्रसिद्ध व्यवसायिकाचे स्टील गोडाऊन आहे. 18 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास या गोडाऊनच्या ऑफिसवर दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबार केल्यानंतर बिश्नोई गँगच्या वतीने या स्टील व्यापाऱ्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची अवाढव्य खंडणी मागण्यात आली होती. इतकेच नव्हे तर व्यापाऱ्याच्या इतर भागीदारांनाही 5 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली गेली होती. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सासवड भागातील एका निर्जन स्थळी सोडून दिली होती, ज्याचा नंबर प्लेटवरील नंबर खोडण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या पथकाला आरोपी राजस्थानमध्ये लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन पवन राम याला अटक केली. या गुन्ह्यात सामील असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा कसून तपास केला जात आहे.






