पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. सध्या पुण्यात अधिकृतपणे पावसाळा सुरू झाला असला, तरी शहराची पाण्याची चिंता वाढली आहे.गेल्या 2 दिवसांपासून शहरात केवळ रिमझिम पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रात पाण्याची आवक झालेली नाही. परिणामी, पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख 4 धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून एकूण उपयुक्त साठा अवघा 13% वर आला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा 56% इतका होता, म्हणजेच एका वर्षात तब्बल 43% ते 47% ची मोठी घट झाली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, धरणांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

टेमघर धरण: 0% (पूर्णपणे कोरडे)
वरसगाव धरण: 13%
खडकवासला धरण: 15% (रिमझिम पावसामुळे यात फक्त 1 ते 2% वाढ झाली आहे)
पानशेत धरण: 18%
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ‘टेमघर’ धरणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यंदा या धरणात शून्य टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या 10 वर्षांचा इतिहास पाहिला तर 2016, 2019, 2022 आणि आता 2026 अशा चार वर्षांत हे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. अगदी 2025 मध्येही येथे केवळ 37.95% पाणी होते.
सध्याची परिस्थिती 2016 च्या भीषण दुष्काळासारखीच चिंताजनक बनत चालली आहे. त्यावेळी पानशेतमध्ये 8.10% तर पवना धरणात 10.12% साठा शिल्लक होता. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने सर्व नागरिकांना पाणी अत्यंत जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
आगामी काही दिवसांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला नाही, तर पुणे शहरात लवकरच पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे पुणेकरांवर पाण्याचे संकट ओढवले आहे.







