सोलापुर: सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांना नफा तर दूरच, उलट स्वतःच्या खिशातून पैसे भरण्याची वेळ आल्याचे उदाहरण समोर आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे.
सोलापूर येथील शेतकरी शशीराव तोडकर यांनी काही दिवसांपूर्वी विक्रीसाठी 24 गोण्या कांदा अडत बाजारात आणला होता. या कांद्याचे एकूण वजन 12.87 क्विंटल इतके होते. मात्र बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल फक्त 100 ते 150 रुपये दर मिळाल्याने त्यांना एकूण 1496 रुपयेच मिळाले.
विशेष म्हणजे वाहतूक, अडत, हमाली आणि इतर खर्च मिळून त्यांना 1769 रुपये खर्च आला. त्यामुळे कांदा विकून नफा मिळण्याऐवजी शशीराव तोडकर यांना उलट 301 रुपये स्वतःच्या खिशातून भरावे लागले. या व्यवहाराची पट्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. कांदा उत्पादकांना योग्य दर मिळावा, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.






