कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरगाव येथे माजी सरपंच महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. या प्रकरणात महिलेचा शेजारी आणि कथित प्रियकर असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात दोघांमध्ये वैयक्तिक कारणांवरून वाद झाल्याची माहिती समोर आली असून, त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत महिलेचे नाव सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) असे असून त्या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. त्यांचे पती दीड वर्षांपूर्वी निधन पावल्यानंतर आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील (वय 40) याच्याशी त्यांची जवळीक वाढल्याचे तपासात समोर आले आहे. दोघेही शेजारी राहत असल्याने एकमेकांची ओळख होती. काही काळानंतर दोघांमध्ये वैयक्तिक कारणांमुळे मतभेद निर्माण झाले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला पंढरपूरला जाण्याचे सांगून कारमध्ये बसवले. मात्र, त्यांना दुसरीकडे नेऊन गावाबाहेरील एका गोठ्यात गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून कारच्या डिकीत ठेवून तो भिवंडीकडे रवाना झाला.
दरम्यान, भिवंडी परिसरात पोहोचल्यानंतर आरोपीने आपल्या नातेवाईकाला फोन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितल्याचे सांगितले जाते. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीने तातडीने पोलिसांना याबाबत खबर दिली. त्यानंतर नारपोली पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता डिकीत महिलेचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून वाहनही जप्त केले आहे. चौकशीदरम्यान वैयक्तिक वादातून हा गुन्हा केल्याची माहिती आरोपीने दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






