पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघाताला सहा महिने उलटूनही तपासाचा अंतिम अहवाल जाहीर झालेला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणांनी विलंब न करता सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने युगेंद्र पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात असलेल्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तपासाच्या संथ गतीवर टीका केली. अपघातानंतर अनेक चर्चा झाल्या, विविध पातळ्यांवर चौकशी सुरू असल्याचे सांगितले गेले, मात्र अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

युगेंद्र पवार म्हणाले की, “दादांच्या निधनाला सहा महिने झाले, पण आजही त्या दिवशी नेमकं काय घडलं याचं स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. आम्ही संयमाने प्रतीक्षा केली, मात्र तपासात अपेक्षित प्रगती दिसत नाही. जनतेलाही सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.”
यावेळी त्यांनी अपघातानंतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सीआयडी आणि डीजीसीएकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी अंतिम अहवाल अद्याप प्रसिद्ध न झाल्याने अनेक शंका कायम असल्याचे त्यांनी म्हटले.
तपास यंत्रणांनी विलंब न करता अपघाताच्या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, संबंधित निष्कर्ष स्पष्टपणे मांडावेत आणि त्या दिवशी नेमके काय घडले याची माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली. या प्रकरणाचा अंतिम अहवाल लवकर जाहीर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.






