अमरावती: परतवाडा येथे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेवर भाष्य करताना भाजप नेत्या नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणाला गंभीर स्वर देत “राज्यात लव्ह जिहादसारखे प्रकार सुरू असताना काही लोक गप्प का बसतात?” असा सवाल उपस्थित केला.
नवनीत राणा यांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावरही थेट निशाणा साधला. “नाशिकमध्ये मुलींना बीफ दिलं, बुरखा घालायला लावला, अमरावतीत कोल्हे प्रकरण घडलं तेव्हा प्यारे खान कुठे होते? राज्यात अशा घटना घडतात तेव्हा ते पुढे का येत नाहीत?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
तसेच, “प्यारे खान यांनी कुराण बाजूला ठेवून संविधान पुढे ठेवणार का?” असा थेट सवालही त्यांनी केला. “तुम्ही एका जबाबदार पदावर आहात, त्यामुळे आधी समाजाची माफी मागा आणि नंतर माझ्याविरोधात तक्रार करा,” असेही राणा म्हणाल्या.
या प्रकरणातील मुख्य आरोपीबरोबरच त्याच्या वडिलांनाही सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली. “परिसरातील माहितीनुसार आरोपीच्या वडिलांकडूनही या कृत्याला प्रोत्साहन दिलं जात होतं. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, “लॅपटॉप जप्त झाल्यावर या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर येतील. किती मुलींना फसवलं गेलं, याचा पूर्ण उलगडा होईल,” असा दावाही नवनीत राणा यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून विविध नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील माहिती तपासानंतर समोर येणार आहे.







