यवत, (पुणे) : पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 22 वर्षीय तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना उघडकी स आली आहे. वरवंड (ता. दौंड) येथील गोपीनाथनगर परिसरात घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब विनायक शितोळे व भालचंद्र बाळासाहेब शितोळे (दोन्ही रा. वरवंड ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम गणेश खेडकर (वय-22, रा. वरवंड, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम खेडकर आणि आरोपी बाळासाहेब शितोळे हे एकमेकांचे शेजारी आहेत. परिसरातील ‘मम्मी रणधीर’ (पूर्ण नाव माहित नाही) नावाच्या एका महिलेसोबत आरोपींचा जुना वाद आहे. 18 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुभमने त्या महिलेकडून पिण्याच्या पाण्याचा पाईप घेतला होता. ही बाब आरोपींना खटकली.
शुभमने त्या महिलेकडून पाईप का घेतला आणि तो तिला मदत का करतो, याचा राग मनात धरून आरोपी बाळासाहेब शितोळे आणि भालचंद्र शितोळे यांनी शुभमला गाठले. “तू त्या मम्मीची बाजू का घेतोस? तिचे पाणी का भरतोस? तुला लय माज आलाय का? तुला सांगितलेले कळत नाही का?” असे म्हणत आरोपींनी शुभमला अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली.
दरम्यान, वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी शुभमला हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी तिथेच पडलेला एक दगड उचलून शुभमच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यवत पोलीस करीत आहेत.






