पुणे : शेतकरी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.आता शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर पडणार आहे.शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यास आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सुरुवातीला सरकारने 30 जून आणि त्यानंतर 5 जुलै ही मुदत दिली होती, मात्र आता ही 5 जुलैची डेडलाईन देखील हुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका जाहीर सभेत याविषयी मोठी माहिती दिली आहे.

कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्जमाफी योजनेतून करदात्यांना वगळण्यात येणार आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स (आयकर) भरतात, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. अशा करदात्या शेतकऱ्यांची खरी माहिती गोळा करण्यासाठी सरकारने थेट आयकर विभागाकडून यादी मागवली आहे. ही माहिती उपलब्ध होण्यास थोडा वेळ लागत असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया काही दिवस लांबणीवर पडणार आहे.

तसेच साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही सरकारने धोरण स्पष्ट केले आहे. कर्जमाफीमध्ये कारखान्यातील सिझनल (हंगामी) कामगारांना लाभ दिला जाईल, परंतु पर्मनंट (कायमस्वरूपी) कामगारांना यातून वगळले जाईल.

याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “प्रक्रियेला थोडा उशीर होत असला तरी कर्जमाफी निश्चित होणार आहे. राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीची प्रक्रिया आणि अधिवेशन यामुळे आधी विलंब झाला. आता सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून, आयकर विभागाकडून माहिती येताच पुढील ८ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ दिला जाईल.” ही संपूर्ण प्रक्रिया मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. याच कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकारने ही योजना आणली असून, या माध्यमातून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्तीचा मोठा दिलासा मिळणार आहे.







