यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. विवाहबाह्यसंबंध आणि छळातून एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. लाडखेड परिसरात ही घटना घडली असून अतिष देशमुख असे तरुणाचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अतिष आणि रुपाली यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, रुपालीचे लग्न झाल्यानंतरही अतिषने तिचा पाठलाग सोडला नव्हता. तो सातत्याने रुपालीवर दबाव टाकत होता आणि चक्क तिच्या पतीलाच संपवण्याचा प्लॅन तो रुपालीसोबत मिळून आखत होता. मात्र, याच वेळी रुपालीने वेगळाच खेळ खेळत त्यालाच संपवण्याचा कट रचला. रुपालीने पती अंकुशला सर्व प्रकार सांगितला आणि स्वतःच्या पतीला मारण्याऐवजी या दोघांनी मिळून अतिषचा ‘काटा’ काढण्याचे ठरवले.
15 तारखेला अतिषला विश्वासात घेऊन लाडखेड परिसरात एका निर्जन ठिकाणी भेटायला बोलावण्यात आले. अतिष तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या अंकुशने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. डोळ्यांसमोर अंधारी आलेल्या अतिषवर रुपाली आणि अंकुशने धारदार चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की अतिषचा जागीच मृत्यू झाला.







