बीड: बीड जिल्ह्यातील परळी येथे करणी-भानामतीच्या नावाखाली विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. सासरच्या मंडळींनी अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली तिला विविध प्रकारे त्रास दिल्याचा दावा महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे, डोळ्यांत लिंबू पिळणे, विविध तथाकथित उपचार करणे आणि मानसिक छळ केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी परळी शहर पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय महिलेचा विवाह एप्रिल २०२३ मध्ये नांदेड येथील युवकासोबत झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी पती आणि सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप तिने केला आहे. फर्निचरसाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती. तसेच घरात कोंडून ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि सतत मानसिक दबाव टाकला जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींचा करणी-भानामतीवर विश्वास असल्याने तिला अशा प्रकारचे कथित उपचार करणाऱ्या व्यक्तींकडे नेले जात होते. त्यावेळी तिच्या डोळ्यांत लिंबू पिळण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. याशिवाय विविध धार्मिक किंवा अंधश्रद्धेशी संबंधित विधींच्या नावाखाली त्रास दिला जात असल्याचाही दावा तिने केला आहे. गरोदरपणातही जबरदस्तीने औषधांच्या गोळ्या खायला लावल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
सुरुवातीला हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्रात गेले होते. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये समेट न झाल्याने महिलेने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर परळी शहर पोलिसांनी पती, सासू, सासरे तसेच तेलंगणात राहणाऱ्या नणंद आणि तिच्या पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, करणी-भानामती आणि डोळ्यांत लिंबू पिळल्यासारखे सर्व आरोप हे तक्रारदार महिलेच्या निवेदनावर आधारित असून, त्यांची सत्यता तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.






