उरुळी कांचन, (पुणे) : राज्यातील मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तयार करण्यात येणारा मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने तूर्त स्थगित केला आहे. शुक्रवारी (ता. 24) प्रसिद्ध होणारी ‘प्रारूप मतदार यादी’ आता प्रसिद्ध न करण्याचे स्पष्ट आदेश आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकोणी यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, या निर्णयामागे ’विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ (SIR-2026) भारत निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ सुरू आहे. त्यामुळे मतदार यादी कार्यक्रमाला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती विविध जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.

विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम याद्या पूर्णपणे प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम राबवला जावा, अशी शिफारस मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) यांनी १७ जुलै रोजी पत्राद्वारे केली होती. आयोगाच्या संगणकीय प्रणालीनुसार, राज्यातील सुमारे 15 हजार ग्रामपंचायतींपैकी केवळ मोजक्याच ग्रामपंचायतींच्या प्रारूप याद्या तयार झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने 15 जुलै 2026 रोजी दिलेल्या मूळ कार्यक्रमानुसार 24 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून 29 जुलैपर्यंत हरकती मागवल्या जाणार होत्या, तर 4 ऑगस्ट 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, वरील अडचणी विचारात घेऊन 24 जुलैची प्रारूप यादी आता प्रसिद्ध केली जाणार नाही. सदर बाबतच्या सविस्तर सूचना आणि सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम यथावकाश (लवकरच) स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.






