पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नदीपात्रात नवजात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना समोर आली. जन्मानंतर काही वेळातच या बालिकेला नदीपात्रात टाकण्यात आले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, बालिकेला जिवंतपणी पाण्यात टाकण्यात आले की मृत्यूनंतर, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

नदीपात्रात अर्भकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर शहीद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशनचे सदस्य आणि जीवरक्षक बच्चूसिंग टाक यांच्या मदतीने बोटीच्या सहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या बालिकेला नदीपात्रात कोणी आणि कोणत्या परिस्थितीत टाकले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच घटनास्थळाच्या आसपासचे तांत्रिक पुरावेही गोळा केले जात आहेत. परिसरातील रुग्णालये आणि क्लिनिकमध्ये अलीकडे प्रसूती झालेल्या महिलांची माहितीही पोलिसांकडून घेतली जात आहे.
बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण आणि ती नदीपात्रात कशी पोहोचली, याबाबत शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत असून, दोषी व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे.







