पुणे: “महेश उठत नाहीये… त्याचे शरीर पूर्ण थंड पडले आहे, तू जरा बघ ना त्याला काय झालं आहे.” २४ ऑगस्टच्या पहाटे साडेचार वाजता पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका आईने आपल्या दुसऱ्या मुलाला केलेली ही हाक वरकरणी काळजीपोटी असल्याचे वाटत होते. मात्र, काही वेळातच या कथित प्रकारामागे मुलाच्या हत्येचे धक्कादायक सत्य दडल्याचे समोर आले. शवविच्छेदन अहवालामुळे या प्रकरणातील संपूर्ण बनाव उघड झाला.

वारजे माळवाडीतील रामनगर परिसरात श्रावण महिन्यात मटण मागितल्याच्या कारणावरून वडिलांनीच आपल्या ३० वर्षीय मुलाचा मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेशला दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे तो बेरोजगार होता. तसेच सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती.

सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास महेश दारूच्या नशेत घरी आला. श्रावण महिना सुरू असतानाही त्याने आई-वडिलांकडे मटणाची मागणी केली. यावरून त्याचा वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) यांच्याशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर भागवत यांनी महेशला बेदम मारहाण केली. डोक्यावर, नाकावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने महेशचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांनी ही बाब लपवून ठेवली. पहाटेपर्यंत मृतदेह घरातच ठेवण्यात आला. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी दुसरा मुलगा गणेश गायकवाड याला उठवून महेश उठत नसल्याचे सांगितले.
मात्र, गणेशला महेशच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर ताज्या जखमा दिसल्याने त्याला संशय आला. नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात महेशचा मृत्यू नैसर्गिक नसून डोक्यातील गंभीर जखमा आणि श्वसनावरोधामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांच्या तपासात आई-वडिलांनी केलेला बनाव उघडकीस आला. महेशच्या हत्येप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी भागवत गायकवाड आणि पार्वती गायकवाड या दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







