बुलढाणा: एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे, जिथे एका विहिरीमध्ये एकाच घरातील 5 जणांचे मृतदेह तरंगताना आढळले. मृतांमध्ये एक पुरुष आणि त्याच्या 4 लहान मुलांचा समावेश असून, हे सर्वजण आदिवासी समाजातील असल्याचे समजते. जळगाव जामोद येथील राजुरा धरण परिसरात ही घटना घडली असून, एकाच वेळी संपूर्ण कुटुंब संपल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या भयंकर घटनेमागे कौटुंबिक कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेच्या दिवशी सकाळी या व्यक्तीने आधी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडले. तिथून गावी परत येत असताना त्याने राजुरा धरण परिसरातील विहिरीपाशी गाडी थांबवली. कौटुंबिक वाद किंवा आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या या वडिलांनी आपल्या 4 निष्पाप मुलांना एकामागून एक विहिरीत ढकलून दिले आणि नंतर स्वतःही उडी मारून जीवन संपवले, असा संशय आहे.
विहिरीत मृतदेह तरंगत असल्याचे काही स्थानिकांना दिसल्यानंतर जळगाव जामोद पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या, याचा शोध घेण्यासाठी पोलीस मृत व्यक्तीच्या पत्नीची आणि नातेवाईकांची चौकशी करत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.







