नांदेड: नांदेड जिल्ह्यातील एका विवाह सोहळ्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे, कारण या लग्नात डिझेल-डीजे किंवा रोषणाईवर अवाजवी खर्च न करता थेट समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पेठकर कुटुंबाने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. 20 मे रोजी झालेल्या सिद्धेश्वर पेठकर आणि मंजुषा यांच्या विवाहानिमित्त, या परिवाराने गावातील तब्बल 3,465 नागरिकांचा प्रत्येकी 1 लाख रुपयांचा अपघात विमा स्वतःच्या खिशातून उतरवला आहे. यामुळे संपूर्ण गावाला एकाच वेळी तब्बल 33.6 कोटी रुपयांचे भव्य सामूहिक सुरक्षा कवच मिळाले आहे.

या कुटुंबाला सामाजिक कामाची आवड असून त्यांनी हा कौतुकास्पद वारसा पुढे सुरू ठेवला आहे. याआधी अनूप पेठकर यांनी स्वतःच्या लग्नामध्ये उपस्थित वऱ्हाड्यांना हेल्मेटचे वाटप केले होते, तसेच 900 लोकांना विमा आणि हेल्मेट देण्याचा एक विशेष कॅम्पही चालवला होता. आता घरातील लहान भावाच्या लग्नाचे औचित्य साधून त्यांनी थेट पूर्ण गावाचाच विमा काढण्याचा मोठा निर्णय घेतला. या अनोख्या भेटीबद्दल नववधू मंजुषा हिने देखील अत्यंत भावूक होत आनंद व्यक्त केला असून, लग्नाच्या निमित्ताने गावकऱ्यांसाठी काहीतरी चांगले करता आले याचा सार्थ अभिमान असल्याचे तिने सांगितले.
विमा प्रक्रियेत गावातील एकाही पात्र व्यक्तीचे नाव सुटू नये म्हणून पेठकर कुटुंबाने बहादरपुरा ग्रामपंचायतीची अधिकृत मतदार यादीच थेट विमा कंपनीकडे सोपवली होती. त्यामुळे कोणत्याही गावकऱ्याला कागदपत्रे गोळा करण्याचा किंवा फॉर्म भरण्याचा त्रास झाला नाही आणि सर्वांचा ‘ग्रुप अॅक्सिडेंट इन्शुरन्स’ घरबसल्या तयार झाला. ही विमा पॉलिसी पुढील 1 वर्षासाठी लागू असेल, ज्यामध्ये कोणत्याही अपघाती मृत्यूच्या प्रसंगी संबंधित कुटुंबाला 1 लाख रुपयांची तातडीची मदत दिली जाईल. या उपक्रमासाठी मोठा निधी खर्च झाला असला तरी पेठकर परिवाराने खर्चाचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे. दरम्यान, अनेकजण या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.






