राहुलकुमार अवचट

यवत: हडपसर – यवत आणि पुणे – शिरूर उन्नत मार्ग: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून हडपसर ते यवत आणि पुणे – शिरूर मार्गावर प्रस्तावित असलेल्या उन्नत मार्गाचे काम पुढील काही दिवसात सुरू होत आहे. या मोठ्या विकासकामांच्या कालावधीत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी तब्बल सहा महिन्यांपूर्वीच पावले उचलली आहेत. नागरिकांची संभाव्य अडचण ओळखून आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे.

या कामादरम्यान वाहतुकीचे सूक्ष्म नियोजन(मायक्रो-प्लॅनिंग) व्हावे, यासाठी आमदार कुल यांनी यापूर्वी देखील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पुणे यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे प्रकल्प संचालक संजय कदम, MSIDC चे कार्यकारी अभियंता संतोष बंपलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यकारी अभियंता अमोल पवार यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही मार्गावरील नियोजित कामाच्या काळात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले असून महामार्गावरील वाहतुकीचा भार विभागण्यासाठी पर्यायी रस्त्यांचे अचूक नियोजन करणे, आवश्यक तिथे रस्ते दुरुस्ती व रुंदीकरण करणे आणि वाहतूक व्यवस्थापन चोख ठेवण्याबाबत चर्चा झाली असून, विकासकामे वेगाने पूर्ण करतानाच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवण्यावर भर देण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
विकासकामे गतीने पूर्ण करत असतानाच, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे हित जपणे ही आमची प्राथमिकता असून, प्रशासकीय पातळीवर यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार कुल यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सर्व संबंधित विभागांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उन्नत मार्गांचे काम सुरू झाल्यानंतर या दोन्ही अत्यंत गजबजलेल्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांना याचा त्रास होऊ नये, म्हणून आम्ही सहा महिन्यांपूर्वीच याचे नियोजन सुरू केले होते. प्रशासनाने आणि सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे प्रभावी मायक्रो-प्लॅनिंग करावे, अशी मागणी बैठकीत केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
-आमदार राहुल कुल






