राहुलकुमार अवचट

यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना महामार्गाच्या सुरक्षेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र यवत परिसरात पाहायला मिळत होते याबाबत पुणे प्राईम मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही तासातच अनेक ठिकाणचे लोखंडी सुरक्षा पत्रे (MBCB) व यवत येथील गायब झालेली जाळी बसविण्यात आली असून यवत – चौफुला परिसरात असलेले बेकायदा दुभाजक कधी बंद होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे
यवत परिसरातील प्रवीण मसाला कंपनीसमोरील सुरक्षा पत्रे अपघातात तुटून जवळपास महिनाभर झाला तरीही ते बसविण्यात येत नसल्याची बातमी पुणे प्राईम ने प्रसिद्ध केल्या नंतर सदर ठिकाणचे सुरक्षापत्रे (MBCB) व यवत गावातील मुख्य चौकात असलेली दुभाजकावरील सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे.

सेवा रस्त्याची ठिकाणी उपाययोजना आवश्यक
यवत गावाच्या सुरुवातीला महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्ते सुरू होतात. मात्र, सायंकाळनंतर या ठिकाणी ट्रक, टेम्पो आणि मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणावर महामार्गालगत उभी केली जातात.
हॉटेल श्रेयस समोर सोलापूरकडून यवतकडे येणाऱ्या वाहनचालकांना मुख्य मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरील वाहतूक स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताला खुले आमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी सुरक्षा पत्रे बसवावीत किंवा महामार्गावर मालवाहतूक वाहनांना पार्किंग करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फोडलेले दुभाजक दुरुस्त होणार का ?
पुणे सोलापूर महामार्गावर काही ठिकाणी व्यावसायिकांनी आपल्या सोयीनुसार दुभाजक फोडून अनधिकृत मार्ग तयार केल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडून अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग प्रशासनाने अशा सर्व अनधिकृत दुभाजक व तोडलेले पत्रे तातडीने बंद करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






