यवत, ता. १९ : दौंड तालुक्यातील वरवंड येथील एका हॉटेलमध्ये थेट पोलवरील वीजवाहिनीतून अनधिकृत जोडणी करून वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी वीज ग्राहक आणि सध्याच्या वीज वापरदाराविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या बारामती येथील भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रघुनाथ नाथ्याबा गोफणे (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरवंड येथील वीज ग्राहक अहिरेश्वर जगन्नाथ जगताप आणि हॉटेलचे सध्याचे वीज वापरदार सिद्धेश्वर नारायण सरगर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

महावितरणच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” येथे तपासणी करण्यात आली. यावेळी पोलवरून येणाऱ्या इनकमिंग सर्व्हिस वायरला अनधिकृत ‘टॅप’ करून ‘चेंज ओव्हर स्विच’च्या माध्यमातून थेट वीजपुरवठा घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वीजमीटरवर वीज वापराची योग्य नोंद होत नसल्याची बाब स्पष्ट झाली.
तपासणीदरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली वायर जप्त करण्यात आली. तसेच वीजमीटर आणि घटनास्थळाचे छायाचित्रणही करण्यात आले. संबंधित व्यावसायिक ठिकाणाचा एकूण वीजभार ४.९७ किलोवॅट आढळून आला, तर मंजूर भार केवळ २ किलोवॅट असल्याचे तपासात समोर आले.
महावितरणच्या अहवालानुसार ग्राहकाकडून २०७ युनिट वीज वापराची नोंद लपविण्यात आली होती. यासाठी १६ हजार ९८० रुपयांची वीजचोरीची रक्कम ग्राहकाने मार्च महिन्यात भरली असली, तरी २५ हजार रुपयांची तडजोड रक्कम अद्याप भरलेली नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत…






