मुंबई: सर्वोच्च यशाच्या शिखरावर असलेला प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह एका मोठ्या अडचणीत सापडला आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर त्याचा आलेख उंचावला होता, मात्र ‘डॉन 3’ चित्रपटाबाबत घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्यावर थेट चित्रपटसृष्टीत बंदी घालण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने हा कडक निर्णय घेतला असून, इंडस्ट्रीतील कोणाही व्यक्तीने त्याच्यासोबत काम करू नये, असे निर्देश दिले आहेत.

चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यास अवघे 3 आठवडे बाकी असताना रणवीरने दिग्दर्शक फरहान अख्तर आणि निर्मात्यांसोबत झालेल्या मतभेदांमुळे ‘डॉन 3’ मधून अचानक माघार घेतली. त्याच्या या निर्णयामुळे एक्सेल एंटरटेन्मेंटचे तब्बल 45 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीनंतर फरहान अख्तरने फेडरेशनकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. फेडरेशनने रणवीरला अनेकदा बाजू मांडण्यासाठी बोलावले, मात्र त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर ही मोठी कारवाई करण्यात आली. निर्मात्यांनी आता रणवीरकडे 45 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.
या कारवाईनंतर रणवीर सिंगचे बॉलिवूड करिअर संपणार का, असा मोठा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावरही यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या हा कोणताही कायदेशीर किंवा सरकारी बंदीचा हुकूम नाही. फेडरेशनने जारी केलेला हा केवळ एक असहकार्याचा निर्णय आहे. याचा अर्थ असा की, रणवीर पुढे कधीच काम करू शकणार नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’ चे निर्माते आपापसातील हा आर्थिक वाद मिटवत नाहीत, तोपर्यंत रणवीरला भारतात कोणत्याही नवीन चित्रपटाचे शूटिंग करणे किंवा नव्या प्रोजेक्टची निर्मिती करणे कठीण होणार आहे.







