नांदेड: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड (Crime News) तालुक्यातील जवळा मुरार गावात घडलेल्या (Nanded News) एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सुरुवातीला एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना म्हणून समोर आलेल्या या प्रकरणाला पोलीस तपासात अत्यंत गंभीर आणि वेगळे वळण मिळाले आहे. आई-वडील आणि दोन मुलांचा मृत्यू झाला असला, तरी तपासात दोन मुलांनीच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर दोन्ही भावांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मृत आई-वडिलांची नावे राधाबाई रमेश लाखे अशी असून त्यांचे पुत्र उमेश लाखे आणि बजरंग लाखे यांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाबाई आणि रमेश लाखे यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता. ही बाब शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाली आहे. घटनेनंतर उमेश आणि बजरंग हे दोघेही मुगट परिसरात रेल्वेसमोर जाऊन आत्महत्या केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला चारही जणांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. वैद्यकीय तपासणी आणि प्राथमिक चौकशीतून आई-वडिलांच्या मृत्यूमागे घातपात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुलांच्या मृत्यूबाबत तपास केला असता आत्महत्येचा निष्कर्ष काढण्यात आला.
पोलिस तपासात या घटनेमागे आर्थिक अडचणी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. कुटुंब आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती असून, त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने जवळा मुरारसह संपूर्ण मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई-वडिलांच्या हत्येचा गुन्हा मृत दोन्ही भावांवर दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुदखेड पोलीस करत आहेत. एका कुटुंबाचा असा अंत झाल्याने समाजमन सुन्न झाले असून या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.







