नाशिक: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची मालिका समोर येत असतानाच, आता एका जुन्या आत्मचरित्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी 2012 मध्ये लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या पुस्तकातील एका लेखामुळे खरातच्या ‘भविष्यवाणी’चा थरार पुन्हा चर्चेत आला आहे.

नेमका काय आहे तो किस्सा?
पुस्तकातील पान क्र. 182 ते 194 वरील ‘सिद्ध पुरुषांच्या सहवासात’ या प्रकरणात खरातचा उल्लेख आहे. 1999 च्या विधानसभा निवडणुकीचा हा काळ होता. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे निवडणूक लढवत होते. प्रचारादरम्यान झालेल्या एका वादाप्रसंगी नामकर्ण आवारे यांची खरातशी पहिली भेट झाली. दरम्यान, खरातने भाकीत वर्तवले की, “माणिकराव कोकाटे हे 23,450 मताधिक्याने निवडून येतील.” धक्कादायक बाब म्हणजे, त्याने विजयासोबतच एका मृत्यूच्या सावटाचाही इशारा दिला होता. “विजयाचा जल्लोष करता येणार नाही, कारण एका अपघातात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू होईल,” असे त्याने ठामपणे सांगितले होते.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. माणिकराव कोकाटे नेमक्या 23,450 मतांनीच निवडून आले. पण या विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही. मतमोजणीवरून परतत असताना कार्यकर्त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि खरातने सांगितल्याप्रमाणेच दोन कार्यकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा योगायोग होता कि, खरी भविष्यवाणी ते तपासातून समोर येईल.







