Accident News: जळगाव: जळगाव जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशाच एका भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चुलत भावाच्या मुलीचे लग्न आटोपून परत येत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील उमाळा-गाडेगाव परिसरात बुधवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुझफ्फर अली सय्यद बबन (वय 60) आणि ताहेराबी मुजफ्फर अली (वय 55) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी होते.

हे दाम्पत्य आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दुचाकीवरून फर्दापूर येथे गेले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर ते परत जळगावकडे निघाले असताना रस्त्यात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. मुझफ्फर अली हे मसाला विक्रीचा व्यवसाय करत होते आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांत उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.






