जळगाव: जळगाव जिल्ह्यात अघोरी पूजा आणि करणीच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ललित पाटील या भोंदूबाबाने आणि त्याची पत्नी महिमा पाटील हिने एका महिलेची तब्बल 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी दोन्ही आरोपी साडेतीन वर्षांपासून फरार आहेत.

पीडित महिला ही ग्राफिक डिझायनर असून तिची ओळख महिमा पाटीलसोबत कॉलेजपासून होती. घरगुती वादामुळे त्रस्त असलेल्या या महिलेने महिमाशी संपर्क साधला असता, तिने आपल्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून उपाय सुचवला. त्यानंतर ललित पाटील याने ‘अंगात पीर बाबा येतात’ असे भासवत अघोरी विधी सुरू केले आणि कुटुंबावर करणी झाली असल्याची भीती निर्माण केली.
सुरुवातीला लहान रक्कम घेऊन पूजा करण्यात आली. नंतर ‘गुप्त धन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी मोठ्या रकमा उकळण्यात आल्या. ही रक्कम रोख आणि ऑनलाईन पद्धतीने घेतली गेली. आरोपींनी पीडित महिलेला देशभर फिरवत उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर येथे अघोरी पूजा केल्याचे सांगितले. तसेच भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर येथे विशेष पूजा केल्याचे सांगूनही पैसे उकळले.
जळगावात परतल्यानंतरही आरोपी दांपत्याने पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली. पैसे परत मागितल्यावर “मी अघोरी आहे, सात पिढ्यांचा नाश करेन” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
या प्रकरणाचा तपास जळगाव येथील रामानंद पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले असले तरी अद्याप त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. आरोपी महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून आपले पैसे परत मिळावेत, अशी मागणी तिने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.







