Dharashiv: नुकत्याच धाराशिवमध्ये (Dharashiv) झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री व विद्यमान आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तीव्र टीका केली आहे. सावंत म्हणाले, “राष्ट्रवादीची औलद सत्तेशिवाय राहू शकत नाही,” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिव येथील भूम येथे बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीका केली.

सावंत यांनी पुढे बोलताना म्हटलं की, “जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्ता आणि पद हेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच त्यांचं राजकारण नेहमी सत्तेभोवती फिरतं,” असं विधान त्यांनी केलं. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. येणाऱ्या काळात या वक्तव्यावरून दोन्ही पक्षात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


माध्यमांशी बोलताना पुढे त्यांनी सांगितले की, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपतो तसं राष्ट्रवादीला होतं. या दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकच आहे, मी सांगत होतो याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्यात आला असेल. तुम्हाला जर युतीची तत्वे माहिती नसतील तर युती करता कश्याला अश्या भाषेत त्यांनी वक्तव्य केले.
त्याचबरोबर, “गरज नसताना काही लोक कामात हस्तक्षेप करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. आमदार राहुल मोरे यांच्या अजित पवार गटात प्रवेशावरूनही सावंत यांनी सूचक टिप्पणी केली.







