पुणे : सण-उत्सवांच्या काळात भाविक आणि नागरिकांना वाटप करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाच्या गुणवत्तेवर आता अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) थेट नजर राहणार आहे. सणांच्या काळात अन्नपदार्थांची वाढती मागणी आणि त्यातून होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, सर्व धर्मीयांच्या प्रमुख सणांसाठी वर्षभर लागू राहणारा स्थायी आदेश प्रथमच जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या निर्णयानुसार वर्षभरातील विविध सणांचे नियोजन आधीच करण्यात आले असून, प्रत्येक सणाच्या कालावधीत कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांची तपासणी करायची, कोणत्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचे आणि कारवाई कशी करायची, याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक सणाच्या आधी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज राहणार नाही.

सणांच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा तसेच मांसाहारी पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. वर्षभरातील सणांचे राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक असे तीन स्तर करण्यात आले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्या हे राज्यव्यापी सण पहिल्या श्रेणीत आहेत.

दुसऱ्या श्रेणीत मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी आणि कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती यांचा समावेश आहे. स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस यांचा तिसऱ्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
कारवाईची सुरुवात संबंधित सणाच्या २१ दिवस आधी केली जाणार असून, सण संपल्यानंतर ३० दिवसांपर्यंत तपासणी आणि कारवाईची प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासाठी चार टप्प्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात भेसळीचा धोका असलेल्या अन्नपदार्थांचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना दिली जाईल.
दुसऱ्या टप्प्यात गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि अन्नपदार्थांची वाहतूक यावर लक्ष केंद्रित केले जाईल. विशेषतः पहाटेच्या वेळी नाका तपासणी केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात सणाच्या दिवशी भरारी पथकांकडून महाप्रसाद, लंगर, भंडारे आणि इतर अन्नवाटपाच्या ठिकाणी अचानक तपासणी केली जाईल. नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास चौथ्या टप्प्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
उपवासाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांसारख्या पदार्थांचे नमुने आधीच घेण्यावर भर दिला जाणार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ तसेच बुरशीजन्य पदार्थांवरही लक्ष ठेवले जाईल. मांस, पाणी आणि बर्फाच्या बाबतीत स्वच्छता, शीत साखळी आणि अधिकृत कत्तलखान्यांशी संबंधित नियमांची तपासणी होणार आहे.
मिठाईवर वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वर्खाची गुणवत्ता आणि खाद्यरंगांचा वापर नियमानुसार आहे की नाही, याचीही तपासणी केली जाईल. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या काळात फळे पिकवण्याच्या पद्धती, नाताळमध्ये बेकरी पदार्थ आणि रमजान तसेच ईदच्या काळात विशेष अन्नपदार्थांची तपासणी केली जाणार आहे.
ई-कॉमर्सच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसह आयात केलेले अन्न, बेकरी उत्पादने आणि पॅकबंद पाण्यावरही एफडीएकडून लक्ष ठेवले जाणार आहे. भेसळीच्या प्रकरणांमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेण्यात येणार असून, सणांच्या काळात अन्नातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
सण संपल्यानंतर १४ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषींविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महाप्रसाद असो, लंगर असो किंवा भंडारा; नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी आता एफडीएची यंत्रणा वर्षभर सक्रिय राहणार आहे.






