छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नव्या (Samrudhhi Expressway Scam) वादाला तोंड फुटले आहे. अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. समृद्धी महामार्गालगत (Ambadas Danave) जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे हिबानामा करून बळकावल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

दानवे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर बक्षीसपत्राद्वारे वर्ग करण्यात आली. मात्र या कागदपत्रांमध्ये हिबानामा 1971 सालचा दाखवण्यात आला असून संबंधित व्यक्तीचा जन्म 1985 मध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे 1971 मध्ये त्या व्यक्तीच्या नावावर जमीन कशी काय झाली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी दस्तऐवजांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ही जमीन समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली असून संपादन मूल्य सुमारे 1150 कोटी रुपये निश्चित झाल्याचे सांगितले जाते. इतक्या मोठ्या मोबदल्यावर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी कागदपत्रांत फेरफार झाल्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त केली. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, भुमरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित हिबानामा खोटा असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की जावेद रसूल हा त्यांचा ड्रायव्हर असला तरी त्याचा या व्यवहाराशी संबंध नाही. आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचे सूचित करत त्यांनी दानवे यांनी आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान दिले.
समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये जमीन संपादन प्रक्रियेत पारदर्शकता महत्त्वाची ठरते. आरोप-प्रत्यारोपांच्या या पार्श्वभूमीवर अधिकृत चौकशी झाल्यासच सत्य स्पष्ट होणार आहे.







