बीड : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि श्रीक्षेत्र गहीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांची बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहीनाथ गडावर अचानक भेट झाली. यावेळी यांच्यात दुपारी तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान, कोणत्या विषयावर चर्चा झाली या संदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी राजकीय, सामाजिक, धार्मिक विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Prakash Ambedkar)
प्रकाश आंबेडकर यांनी संत वामन भाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन गडाच्या वतीने स्नेहभोजनही केले. दरम्यान, अचानक झालेल्या भेटीने परिसरात एकच चर्चा रंगली होती. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर संघर्ष करणारे बाळासाहेब आंबेडकर गुरुवारी निवांत दिसले. त्यांनी अचानक श्रीक्षेत्र गहीनाथ गडावर दुपारच्या वेळी महन्त विठ्ठल महाराज यांच्याशी बंद दाराआड मुक्त संवाद साधला. (Mahant Vitthal Maharaj)

एक वर्षावर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या असून सर्वच राजकीय नेते राज्यभर दौरे करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा आणि संवाद साधत आहेत. अशातच काल गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांनी अचानक संत वामनभाऊ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत हा गड राज्य आणि देशभराच्या धार्मिक नकाशावर आहे. लाखो भक्त येथे पुण्यतिथीला येतात.(Lok Sabha Election)
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि महंत विठ्ठल महाराज यांच्यामध्ये तब्बल दोन तासाहून अधिक बंद दाराआड कोणत्या विषयावर चर्चा झाली? यासंदर्भात तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण सर, तक्रार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. विष्णू जाधव सर, जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सचिन मेघ डंबर, शामसुंदर वाघमारे, सुभाष सोनवणे, राहुल सोनवणे विविध पदाधिकारी उपस्थित होते.







