रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील १७ जणांच्या ग्रुपमधील दोघे जण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील १७ जणांचा ग्रुप पर्यटनासाठी रायगडमधील देवकुंड धबधब्यावर गेला होता. धबधब्याखाली पाण्यात पर्यटनाचा आनंद घेत असताना दोघे जण अचानक पाण्यात बुडाले. घटनेनंतर इतर सहकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. मात्र, बुडालेल्या दोघांची ओळख आणि त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे देवकुंड धबधब्यासह माणगाव तालुक्यातील अनेक वर्षा पर्यटनस्थळांवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. या परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात असताना हा पर्यटकांचा ग्रुप धबधब्यापर्यंत कसा पोहोचला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक आणि पोलीस युद्धपातळीवर मोहीम राबवत आहेत.







