Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या सिंधुदुर्गातून एक महत्त्वाचा संदेश जाण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून कणकवली येथे दुपारी साडेतीन वाजता त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. ही सभा केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता, महायुतीच्या वाढत्या राजकीय ताकदीचे शक्तिप्रदर्शन ठरणार असल्याचे चित्र आहे. (Politics)

या सभेला विशेष महत्त्व आहे कारण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत मोठे यश मिळवले आहे. जिल्हा परिषदचे सात सदस्य आणि पंचायत समितीचे आठ सदस्य महायुतीकडून बिनविरोध निवडून आले असून, एकूण 17 उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही सिंधुदुर्गच्या राजकारणात दुर्मीळ आणि लक्षवेधी बाब मानली जात आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस जाहीर सभेत नितेश राणे यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार करणार आहेत. त्यामुळे ही सभा नितेश राणेंच्या नेतृत्वाला मिळालेली पावती म्हणून पाहिली जात आहे.
दरम्यान, या सभेत आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सतीश सावंत, जे कधीकाळी नारायण राणेंचे कट्टर समर्थक होते आणि नंतर ठाकरे गटात सक्रिय झाले, ते तब्बल सात वर्षांनंतर ठाकरे सेनेला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. उद्या त्यांनी भूमिका बदलली, तर सिंधुदुर्गात ठाकरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जाईल.
सिंधुदुर्गात महायुतीने जवळपास सर्वच तालुक्यांत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवर बिनविरोध यश मिळवले आहे. भाजप आणि शिंदे गटाची मजबूत पकड, तसेच स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती यामुळे विरोधक अक्षरशः कोपऱ्यात गेल्याचे चित्र आहे.
एकूणच, मुख्यमंत्री फडणवीसांचा हा दौरा केवळ सभा नसून, सिंधुदुर्गात महायुतीचं वर्चस्व अधिक ठळक करणारा आणि आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरणार आहे.







