भिगवण, ता.1 : अंगणात वाळत घातलेल्या कपड्यांमधून पडलेल्या पाण्यावरून झालेला किरकोळ वाद मनात ठेवून काही दिवसांनी दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना भिगवण परिसरात घडली आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात विक्रम बाळासो माडगे, त्यांची पत्नी रूपाली माडगे तसेच दोन अनोळखी इसम अशा एकूण चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी उर्फ गणेश तुकाराम जमदाडे (वय ४६) यांच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी अंगणात कपडे वाळत घातले असता त्यातून पडलेले पाणी आरोपींच्या अंगावर उडाले. या किरकोळ कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला होता. मात्र, हा वाद मनात ठेवून आरोपींनी सूडभावनेतून हल्ला केल्याचे समोर आले आहे.
२६ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ ते १० वाजण्याच्या दरम्यान जमदाडे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या किराणा दुकानात काही सामान घेण्यासाठी थांबले असता, दबा धरून बसलेल्या विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे तसेच त्यांच्या साथीदारांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड व कोयत्यासारख्या हत्यारांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जमदाडे यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापती झाल्या.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह शस्त्र कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे या पती-पत्नीला अटक केली असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत माहिती देताना भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले की, “घटनेचा सखोल तपास सुरू असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल.”






