शहापूर : अनोळखी इसमाची हत्या करून फरार झालेल्या एका महिलेसह तिघांना शहापूर पोलिसांनी सोमवारी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते हत्या करणाऱ्यांचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून अवघ्या पाच दिवसांतच पोलिसांनी छडा लावला आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे निष्पन्न झाले असून सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली येथील वसीम पठाण, राहुल गुंजाळ व शीतल फोडसे या तिघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.
शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी गावाजवळील उंबरखांड गावाच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह ३० एप्रिलला आढळून आला होता. शरीरावरील जखमांमुळे शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक वारूनगसे, पोलीस हवालदार शशिकांत पाटील, विकास सानप, रमेश नलावडे, मोहन भोईर, दशरथ देसले, कमलाकर शिरोसे, अनिल भोसले यांसह ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे महेश कदम, कोळी, विभूते यांनी केलेल्या तपासाच्या माध्यमातून हत्येचा उलगडा झाला.
मृतदेहाचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यात व्हायरल केल्यानंतर मृतदेह नाशिक जिल्ह्यातील पांडुर्ली येथील असल्याचे समोर आले. शहापूर पोलिसांनी पांडुर्ली येथे धाव घेतली. चौकशीअंती अशोक मधे असे मृत तरुणाचे नाव समोर आल्यानंतर तो वसीम पठाण, राहुल गुंजाळ व शीतल फोडसे यांच्याबरोबर गेला असल्याचे समजले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने वसीम, राहुल व शीतलच्या मुसक्या आवळत त्यांना शहापूरमध्ये आणले.
महिलेसह तिघांना पोलिसांनी केले जेरबंद
या संपूर्ण हत्या प्रकरणाची एक फुल दो माली अशी या गुन्ह्याची प्रेमकथा असून शीतलने तिचा प्रेमी वसीम व सहकारी राहुल यांच्या सहकार्याने तिच्यावर प्रेम करणारा पहिला प्रियकर अशोकची शहापूर तालुक्यात आणून हत्या केली असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास तपास पोलीस करीत आहेत.