Palghar News: पालघर : पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात अजूनही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, याची पुन्हा एकदा वेदनादायक जाणीव करून देणारी घटना जव्हार तालुक्यात घडली आहे. जव्हारमधील तिलोंडा (आंबेपाडा) या आदिवासी गावात रस्त्याअभावी वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ही घटना घडली.

मृत तरुणाचे नाव शैलेश मगन वागदादा असे असून तो काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने उपचारांची गरज होती. मात्र गावाला जोडणारा सुमारे 4 किलोमीटरचा रस्ता नसल्याने रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहन गावात पोहोचू शकले नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शैलेशला तात्पुरत्या पालखीमध्ये ठेवून डोंगराळ आणि खडतर वाटेने आरोग्य केंद्राकडे नेण्याचा प्रयत्न केला.
रस्ता नसल्यामुळे या प्रवासात बराच वेळ गेला. या विलंबामुळे शैलेशला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तिलोंडा (आंबेपाडा) हे आदिवासी वस्तीचे गाव असून येथे आजही रस्ता, वाहतूक आणि आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. अशा वेळी आजारी रुग्णांना डोंगरातून चालत किंवा खांद्यावरून वाहून नेण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.
या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायत, स्थानिक प्रतिनिधी आणि संबंधित विभागांनी वेळेत लक्ष दिले असते तर एका तरुणाचा जीव वाचू शकला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेची गंभीर अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अधिक बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.







