Baramati Airport: पुणे : बारामती विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळ परिसरात झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या अपघातानंतर राज्यातील लहान आणि अनियंत्रित विमानतळांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

प्राथमिक तपासात धावपट्टीचा चुकीचा वापर, योग्य दिशादर्शक यंत्रणा नसणे तसेच नेव्हिगेशन आणि देखरेख प्रणालींचा अभाव ही अपघाताची संभाव्य कारणे असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अनियंत्रित हवाई पट्ट्यांचे सुरक्षा ऑडिट करणे आणि उड्डाण प्रशिक्षण संस्था तसेच खासगी विमानसेवांची तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी पुढे आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, बारामती विमानतळाच्या धावपट्टीचे उन्नतीकरण करण्यात येईल. यासोबतच आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली बसवण्यात येणार असून हवाई वाहतूक नियंत्रणाची देखरेख अधिक मजबूत केली जाईल. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमार्फत राबवण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढे नेण्याबाबत सरकार ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलिकडच्या काळात चार्टर विमानसेवा आणि प्रशिक्षणासाठी लहान विमानतळांचा वापर वाढला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, कार्यपद्धती आणि सुरक्षा यंत्रणांचे नियमित ऑडिट करणे गरजेचे असल्याचे विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. वेळेवर दुरुस्तीची कामे आणि सुधारणा न झाल्यास भविष्यात अपघातांचा धोका वाढू शकतो.
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक विमानतळ आणि हवाई पट्टे आहेत. बारामती विमानतळ हा टेबलटॉप धावपट्टी असलेला विमानतळ असून, तो मागील वर्षी एमआयडीसीकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. आता नवीन प्रकल्प अहवाल तयार करणे किंवा जुन्या योजनेत सुधारणा करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे.
विमान वाहतूक तज्ञांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अधिक कडक आणि वारंवार तपासणी करावी, तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे विमान प्रवास सुरक्षित होईल आणि जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.







