पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील ज्येष्ठ नेते आणि (Maharashtra Politics0 राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील भाजपमध्ये जाणार (Jayant Patil) असल्याचा दावा सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी केल्यानंतर सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य (Ajit Pawar) विलिनीकरणावर चर्चा सुरू असताना, दुसरीकडे जयंत पाटील थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.

सदाभाऊ खोत यांनी सांगलीत बोलताना “आता काटा उलटा फिरायला लागलाय, जयंत पाटील फार दिवस तिकडे बसणार नाहीत. थोड्याच दिवसांत ते भाजपमध्ये येतील,” असा दावा केला होता. यावर जयंत पाटील यांनी त्वरित आणि तीव्र प्रतिक्रिया देत हा दावा साफ फेटाळून लावला.
जयंत पाटील म्हणाले, “दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे आणि आता मला भाजपमध्ये जाणार म्हणतोय. हा विनोद नाही तर काय?” अशा शब्दांत त्यांनी सदाभाऊ खोत यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी अप्रत्यक्षपणे खोत यांच्या राजकीय प्रवासावरही टीका करत, सत्तेशिवाय काही लोकांना राजकारण करता येत नाही, असा टोला लगावला.
ही वाक्ययुद्धाची ठिणगी सांगलीतील वाळवा येथे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना–महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेतून उडाली. त्या सभेत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.
दरम्यान, जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न नाही. त्यामुळे हा दावा राजकीय अफवा आणि दबावाच्या राजकारणाचा भाग असल्याचे मानले जात आहे. सांगलीच्या राजकारणात आधीच असलेली धुसफूस आता उघडपणे समोर येताना दिसत असून, आगामी काळात ही जुंपली आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







