Big Breaking सासवड, ता. ५ : सुपे खुर्द (ता. पुरंदर) येथे पार पडलेल्या एका विवाहसोहळ्यातील जेवणातून सुमारे ७० ते ८० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (ता. ३) रात्री ही घटना घडली असून, अचानक तब्येत बिघडल्याने नागरिकांना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. Big Breaking

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुपे खुर्द येथील समृद्धी मंगल कार्यालयात कदम व बोराटे कुटुंबियांचा विवाहसोहळा पार पडला. या कार्यक्रमातील अन्न सेवन केल्यानंतर अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याने बाधितांना सासवड येथील मोरया, जनहितार्थ, युनिटी तसेच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर असून, काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मात्र अंदाजे १० रुग्ण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. अन्नातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, कोणत्या पदार्थामुळे त्रास झाला याचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. संबंधित केटरिंग व्यवस्थेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे लग्नसमारंभातील अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Big Breaking






