सिंधुदुर्ग: भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी कोकणातील समुद्रात आढळलेले तेलसाठे महत्तवपूर्ण ठरणार आहे. पालघर येथील डहाणूच्या समुद्रात ५, ३३८. ०३ चौ. कि.मी. व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रात १९ हजार १३१.७२ चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे सापडले आहेत. कोकणातील डहाणू आणि मालवण या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन झाल्यास स्थानिक उद्योगांना चालना मिळेल. तसेच कोकणात अरबी समुद्रात तेलसाठे आढळल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे संशोधन व उत्खनन कायार्ला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
भारतातील तेल उत्पादन ४ पटीने वाढणार
महाराष्ट्रात या तेल साठ्यांमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. भारताची तेल उत्पादन क्षमतादेखील वाढणार आहे आणि रोजगारांच्या अनेक संधी निर्माण करतील. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. तळ कोकणाजवळील अरबी समुद्रात नवे खनिज तेलसाठे सापडल्याची माहिती मिळाली आहे. कोकणातील पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये हे मोठे तेल साठे सापडले असल्यामुळे भारतातील तेल साठा अजून भक्कम होण्यास मदत मिळणार आहे. केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या संशोधन करून या ठिकाणावरील उत्खनन करणार आहेत. आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन ४ पटीने वाढण्याची शक्यता आहे.
देशाचे लक्ष कोकणातील समुद्रावर
सर्वाधिक मोठा तेल साठा सापडल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या कोकण समुद्रावर आहे. पालघर आणि सिंधुदुर्गच्या समुद्राच्या खोल पाण्यात मोठे तेल साठे आढळले आहेत. बॉम्बेहाय नावाने ओळखला जाणारा तेलसाठा १९७४ मध्ये मुंबईच्या समुद्रात सापडला. हा तेल साठा आजही उत्खननासाठी महत्त्वाचा आहे, आणि त्यानंतर २०१७ मध्येदेखील तेल साठे सापडले होते. मात्र, या वेळीस सापडलेला हा मोठा तेल साठा इतर साठ्यांच्या तुलनेत सर्वाधिक मोठा असल्याने तेल उत्पादन चार पटीने वाढणार आहे. या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठ्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा, अंदाज वर्तवण्यात येत आहे.