कर्जतः वडवली गावातील ग्रामस्थांमध्ये किरकोळ वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर परस्परविरोधी तक्रारी देण्यासाठी दोन्ही बाजूंचे ग्रामस्थ कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, या दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होत पोलीस ठाण्यासमोरच कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले.

कडावमधील वडवली गावात पवार आणि मराडे कुटुंबांमध्ये वाद सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून विकास हरड आणि कैलास पवार यांच्यात एका रस्त्याच्या वापराबाबत मतभेद होते. कैलास पवार यांनी गावातील एका रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र विकास हरड यांनी त्यांच्या घरासमोर कठडा बांधून तो रस्ता अडवला. हा वाद ग्रामपंचायतीपर्यंत गेला, पण तोडगा निघाला नाही. अखेर १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता कैलास पवार आणि त्यांचे चुलत भाऊ वैभव पवार यांनी विकास हरड यांच्या घरासमोर जाऊन कठडा तोडण्याची मागणी केली.

यावरून वाद सुरू झाला आणि वैभव पवार यांनी लोखंडी रॉड व कोयत्याने विकास हरड आणि त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला. यात विकास हरड आणि त्यांचा भाचा हितेश घुडे जखमी झाले. या प्रकरणानंतर रात्री ९.३० च्या सुमारास विकास हरड, हितेश घुडे आणि त्यांचे साथीदार कर्जत पोलीस ठाण्यासमोरच्या मैदानावर थांबले असताना, कैलास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीतून येत मोठमोठ्याने शिविगाळ केली. त्यांना शांत करण्यासाठी गेलेल्या मोहन मराडे, रोशन मराडे, प्रथम मराडे आणि हितेश घुडे यांच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रोशन मराडे यांच्या डाव्या हाताला, मोहन मराडे यांच्या डोक्याला आणि प्रथम मराडे यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या. मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कैलास पवार यांनाही गावातील रस्त्याच्या वादावरून धमक्या मिळत होत्या. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजता विकास हरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि शासकीय भवनाजवळ त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात कैलास पवार, त्यांची आई सुरेखा पवार, मनोज पवार आणि वैभव पवार जखमी झाले. कर्जत पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींची नोंद घेतली आहे. मंगळवारी सकाळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत पोलीस ठाण्याला भेट देत माहिती घेतली.







