संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा विठुरायाच्या पंढरपूर दिशेनं भक्तिभावाने मार्गस्थ झाला असून, आज सोन्याच्या जेजुरीत खंडोबाच्या चरणी पोहोचला आहे. पहाटेपासूनच लाखो वारकरी खंडोबा गडावर दाखल झाले असून, टाळ, मृदुंग, अभंग आणि भक्तीचा महापूर जेजुरीत अनुभवायला मिळत आहे. शैव आणि वैष्णव परंपरेचा अनोखा संगम असलेल्या या ठिकाणी आजची वारी विशेष रंगतदार ठरली आहे.

दरम्यान, पालखी सोहळा रविवारी दिवे घाट पार करत सासवड मुक्कामी पोहोचला, तेव्हा मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती. याच दरम्यान, पालखीतील एका बैलाने अचानक उधळ घेतल्याने काही काळासाठी वातावरणात गोंधळ निर्माण झाला. गर्दीमुळे बैल घाबरून उधळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून, घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिवे घाट चढताना ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाला चार ते पाच बैलजोड्या जोडण्यात आलेल्या होत्या. त्यामधील एक बैल गर्दी पाहून अस्वस्थ झाला आणि अचानक उधळला. त्यामुळे वारकरी आणि उपस्थित नागरिकांमध्ये धावपळ उडाली. काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वेळेत नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
पंढरीच्या वाटेवर काही ठिकाणी पावसाच्या हलक्याशा सरींचा अनुभव येत असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करत वारकरींची अखंड सेवा आणि भक्तीभावाने मार्गक्रमणा सुरू आहे. रस्त्यातील अडथळे, हवामानातील बदल, गर्दी या साऱ्या गोष्टी वारकऱ्यांना रोखू शकत नाहीत. कारण त्यांच्या मनात आहे एकच ध्यास आहे “विठुरायाच्या दर्शनाचा!”
आजचा दिवस मात्र वारी परंपरेच्या इतिहासात खास ठरणार आहे. कारण लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत, अभंगाच्या गजरात आणि खंडोबाच्या साक्षीने माऊलींची पालखी सोन्याच्या जेजुरीत पोहोचली आहे. ड्रोन्सच्या माध्यमातून घेतलेली खंडोबा गडाची दृश्यं, फडांची सजावट, भगव्या पताका आणि भक्तिभावाने न्हालेलं वातावरण हे सगळं अनुभवणं म्हणजे एक अध्यात्मिक सोहळाच!







