पुणे: इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलासह अन्य वस्तूंच्या किमतींवर परिणाम होत असून, यामुळे पुण्यातील खाद्यतेलाचे दर कडाडले आहेत. मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात विविध खाद्यतेलांच्या किमतीत प्रति किलो ३ ते ४ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे, तर मोठ्या डब्यांचे (१५ लिटर/किलो) भाव ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत.

संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेली अनिश्चितता आणि खनिज तेलाच्या (क्रूड ऑइल) दरातील वाढ हे खाद्यतेल दरवाढीचे मुख्य कारण आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे खनिज तेलाचे दर प्रति बॅरल सहा डॉलर्सनी वाढले आहेत. याचा परिणाम उत्पादन खर्च आणि वाहतुकीवर झाल्याने सोयाबीन, पाम, सूर्यफूलसारख्या प्रमुख खाद्यतेलांचे भाव वाढले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केले होते, ज्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र आता युद्धामुळे ही स्थिती बदलली आहे. २५ किलोच्या खोबरेल तेलाचा डबा आता ६००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किंमत वाढल्यामुळे सध्या बाजारात खोबरेल तेलाची आवक थंडावली आहे.
सध्याचे घाऊक दर (१५ किलो/१५ लिटर डबा):
- पाम तेल: रु. १९३५ ते २१६०
- सूर्यफूल तेल : रु. १९८० ते २१३०
- सरकी तेल: रु. १९५० ते २२००
- वनस्पती तूप: रु. १८५० ते २२००
- सोयाबीन तेल: रु. १८६० ते २०६०
सध्या मागणी कमी असली तरी, आगामी काळात मागणी वाढल्यास खाद्यतेलाचे भाव आणखी वाढू शकतात, अशी शक्यता व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे. या दरवाढीचा थेट परिणाम पुणेकरांच्या बजेटवर होणार आहे.







