मुंबई: भारतीय क्रिकेटमधील सध्याची सर्वात मोठी चर्चा म्हणजे कर्णधार रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता अंतिम टप्प्यात आली आहे का? इंग्लंडसोबत लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा आगामी तिसरा वनडे सामना हा रोहितचा टीम इंडियाकडून खेळला जाणारा शेवटचा सामना असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. २०२७ च्या विश्वचषकाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतीय निवड समितीने संघात आमूलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आता युवा खेळाडूंवर अधिक भर देण्याचे धोरण बीसीसीआयने अवलंबले आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात कार्डिफमध्ये भारताचा ४ विकेट्सने पराभव झाला, त्या सामन्यात रोहितची बॅट शांतच राहिली. या पराभवामुळे मालिका १-१ अशा बरोबरीत आली असून लॉर्ड्सवरील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे. रोहितच्या गेल्या ८ सामन्यांतील कामगिरीवर नजर टाकल्यास, तो सध्या खराब फॉर्मशी संघर्ष करत असल्याचे दिसते. त्याने या काळात केवळ ३०.१ च्या सरासरीने २४१ धावा केल्या असून, केवळ १ अर्धशतक त्याच्या खात्यात जमा आहे.

याउलट, विराट कोहली वनडे संघाच्या भविष्यातील योजनांमध्ये महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. याच वेळी, युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले असून, त्याने अलीकडच्या डावांत २ शतके ठोकून अनेकांची मने जिंकली आहे. निवड समितीला आगामी सुमारे २० सामन्यांत जैस्वालला सातत्याने संधी देऊन त्याला विश्वचषकासाठी तयार करायचे आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत किंवा त्याला संघातून वगळण्याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा घोषणा अद्याप आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणावर बीसीसीआयची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.







