Pune फुरसुंगी, ता. ८ : ऑनलाईन मॅट्रिमोनी संकेतस्थळावरून जुळलेलं नातं अवघ्या काही महिन्यांतच हुंडा, मानसिक छळ आणि कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात उघडकीस आली आहे. “१५ तोळे सोने द्यायला हवे होते, फ्रिज, वॉशिंग मशीन, ६५ इंची टीव्ही आणि घरासाठी २ लाख रुपये आण,” अशी मागणी करत विवाहितेला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे, नणंद आणि नणंदेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune
पती निहाल संजय जाधव, सासु अर्चना संजय जाधव ,सासरे संजय जाधव, नणंद आसावरी रोहित वांजे आणि रोहीत वांजे (सर्व रा. लक्ष्मीनगर पर्वती पायथा, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडीत विवाहिता या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असून त्या फुरसुंगी येथे माहेरी वास्तव्यास आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘शादी डॉट कॉम’ या मॅट्रिमोनी वेबसाईटवरून त्यांची ओळख निहाल संजय जाधव याच्याशी झाली होती. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी लोणी काळभोर येथील संकल्प लॉन्समध्ये विवाह पार पडला.Pune

“१५ तोळे सोने देणारे स्थळ नाकारलं…”
लग्नानंतर सुरुवातीपासूनच सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. “आम्ही मुलासाठी १५ तोळे सोने देणारे स्थळ नाकारले, तुम्ही तरी तेवढं द्यायला हवं होतं,” असे म्हणत सासू अर्चना जाधव या वारंवार टोमणे मारत होत्या. तसेच “चांदीचे देव, भांडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ६५ इंची टीव्ही काहीच आणलं नाही,” असे बोलून अपमानित करत होत्या. फिर्यादी यांचे लग्नाआधी पतीसोबत वेगळं राहण्याचं ठरलं होतं, मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींनी त्यास विरोध केल्याने घरात वाद सुरू झाले. सततच्या मानसिक त्रासामुळे विवाहिता आणि त्यांचे पती वेगळे राहत असतानाही सासू-सासरे वारंवार फोन करून संसारात हस्तक्षेप करत होत्या. Pune
“हीला सोडून दे…”; नणंद-मेहुण्याकडूनही धमक्या
फ्लॅट घेण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर सासरच्या घरी बोलावून “हीला सोडून दे, हीला नांदवायचं नाही,” असे सांगत नणंद आसावरी वांझे आणि तिचा पती रोहित वांझे यांनीही फिर्यादीला धमकावले आहे. तसेच “आमच्या घरात काहीच घेऊन आली नाहीस, नीट राहा नाहीतर तुला बघू,” अशी धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान, संसारातील वाद वाढत असताना पती निहाल जाधव यांनी दारू, मित्रपरिवार आणि आई-वडिलांच्या दबावामुळे वारंवार भांडण केली आहेट. ५ मे रोजी झालेल्या वादादरम्यान पती निहाल जाधव याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर सासू-सासरे घरी आले असता “आमच्या म्हणण्यानुसार राहावं लागेल,” असे सांगून वाद वाढला. यावेळी फिर्यादीची आई या मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असता सासू अर्चना संजय जाधव यांनी त्यांनाही मारहाण केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे विवाहितेचे पती निहाल जाधव यांना बीपी आणि छातीच्या संसर्गाचा त्रास असल्याची माहिती लग्नानंतर समजल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच घर खरेदीसाठी लोन प्रक्रिया सुरू असताना पतीवर आधीपासूनच ६ लाखांचे कर्ज आहे. या सर्व प्रकारामुळे मानसिक छळ सहन करावा लागल्याचे सांगत फिर्यादी यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार फुरसुंगी पोलीस ठाण्यात पाच जणांच्या भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune







