गणेश सुळ
केडगाव (पुणे): निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत निवडणूक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जाहीर केली आहे. यामध्ये दौंड तालुक्यातील देलवडी, एकेरीवाडी, नाथचीवाडी, वासुंदे, देऊळगाव राजे, रोटी, राहु, टेळेवाडी, जिरेगाव, पिलानवाडी, या गावाच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत निवडणूक जाहीर केली आहे.
सरपंचाची निवड ही थेट जनतेतून आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे.
ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चौका-चौकात आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे.
भावी उमेदवार जनसंपर्क वाढवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. भावी उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भावी उमेदवारांनी भाऊ राम-राम म्हणण्यास सुरुवात झाली आहे. कधी राम-राम न घेणारे आता आर्वजून राम-राम घेत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.