पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते व पुण्यातील डॉशिंग चेहरा मानले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी महत्त्वाचे (Pune Politics) वक्तव्य केले आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांना शिवसेनेने महापालिका निवडणूक समन्वयक म्हणून नेमले होते, आणि निवडणुकीपूर्वी त्यांनी आपले मत थेट मांडले आहे.

वसंत मोरे यांनी सांगितले की, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. पुणे शहराची राजकीय गणिते ही इतर शहरांपेक्षा वेगळी आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत वेगवेगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी शिवसेनेला 8 लाख 73 हजार, मनसेला 3 लाख 23 हजार, काँग्रेसला 5 लाख 26 हजार, राष्ट्रवादी काँग्रेसला 13 लाख आणि भाजपला 22 लाख मतदान मिळाले होते.
वसंत मोरे यांच्या मते, जर शिवसेना, मनसे आणि शरद पवारांचा गट युती करून लढला असता, तर 18 लाख मतदान होऊ शकते, जे भाजपच्या मतदानापेक्षा अधिक आहे. मात्र, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने केंद्राची भूमिका वेगळी असल्याने स्थानिक पातळीवर युती करणे कठीण आहे. बिहारमधील निवडणुकीचा आढावा घेता, अशी शक्यता दिसत नाही की काँग्रेस या युतीत सहभागी होईल.
वसंत मोरे यांनी असेही म्हटले की, शिवसेना (उद्धव गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जर एकत्र निवडणूक लढवली, तर पुण्यात महत्त्वाचे राजकीय गणित बदलू शकते. “मनसे आणि शिवसेना यांची युती झाली आहे, फक्त शरद पवार यांचा पक्ष बाकी आहे. जर हे झाले, तर महाविकास आघाडी सत्तेच्या दारात जाऊ शकते, हे माझे वैयक्तिक मत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. प्रारूप प्रभागरचनेवर नोंदविलेल्या 5,922 हरकतींपैकी 1,329 पूर्णत: मान्य झाल्या, 69 अंशत: मान्य करण्यात आल्या तर 4,424 हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. वसंत मोरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला युतीसाठी ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आणि आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या युतीला कोणत्या परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







