पुणे : पोलिस विभाग तसेच तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरुणींना सुमारे ३० लाख ५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून सागर सुखदेव जाधव (रा. गंजपेठ, सध्या रा. चंद्रभागा नगर, लेन नं. २, भारती विद्यापीठ) याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील आहीरे गावची असून, ती पोलिस भरतीसाठी तयारी करत होती. २०२२ साली एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत तिची आरोपी सागर जाधवशी ओळख झाली. त्यानंतर जाधवने तिला पोलिस दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण ११ लाख १० हजार ५०० रुपये उकळले.
उडवाउडवीची उत्तरे आणि दुसरी फसवणूकही उघड
पैसे दिल्यानंतर तरुणीने नोकरीच्या बाबत वारंवार विचारणा केली, मात्र आरोपीने टाळाटाळ सुरू केली. पैसे परत मागितल्यावर त्याने केवळ एक लाख पाच हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम मागितल्यावर तो वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तपासादरम्यान सागर जाधवने आणखी एका तरुणीची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. या दुसऱ्या तरुणीला तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ही रक्कम घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तिनेही याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या सागर जाधव फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. त्याने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करीत आहेत.







