केडगाव: सेवेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्ती (TET Exam) या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विकास शेलार, भीमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, अप्पासाहेब कुल, शांताराम जगताप, तालुका अध्यक्ष रामभाऊ दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या संदर्भात विकास शेलार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी घेतलेला टीईटी सक्तीचा निर्णय शिक्षकांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय शिक्षकांची गुणवत्ता व कार्यक्षमता यांच्यावर शंका घेणारा आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करणे गरजेचे आहे.

याशिवाय जिल्हा अंतर्गत बदल्यांमधील सातवा टप्पा रद्द करून त्याऐवजी नवीन निवड झालेल्या शिक्षकांची नेमणूक करावी. तसेच पदोन्नती प्रक्रिया राबवावी. पदोन्नती झालेल्या शिक्षकांच्या जागी विस्थापित झालेल्या शिक्षकांना संधी देण्यात यावी, आदी मागण्या शिक्षक संघाच्या वतीने गोरे यांना करण्यात आल्या. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री गोरे यांनी दिले.








