पुणे: पुणे जिल्ह्यातील महसुली १८३६ गावांपैकी उर्वरित ३२३ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील १०० दिवसांमध्ये ही गावे कचरामुक्त होणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. यासाठी तीन कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आले आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सात कलमी कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १८३६ महसुली गावे आहेत. त्यांपैकी आतापर्यंत १५१३ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात आला आहे. म्हणजेच एकूण गावांच्या तुलनेत सुमारे ८२ टक्के गावांमध्ये घनकचरा प्रकल्पाचे काम झाले आहे. आता येत्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत उर्वरित गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेऊन त्यांना प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील एकूण महसुली गावपैिकी उर्वरित ३२३ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कंपोष्ट पीठ (खतखड्डे), कचरा वाहतूक, प्लास्टिक कागदचे संकलन शेड उभारण्यात येणार आहे. परसबाग, शोषखड्डे करण्यात येणार आहे. मोठ्या गावातील सांडपाणी प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिलागतील ३२३ गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून आता प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ३२३ गावे येत्या १५ एप्रिलपर्यंत कचरामुक्त होणार आहेत.







